पालखी मार्गावरील गजानन चौकातील वृक्षतोड थांबवण्यासाठी नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी कडून निवेदन
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रशासनाला विसर?
पाचगणी नगरपरिषदेला देश पातळीवरील पुरस्कार मिळवून देणारे मुख्याधिकारी निखिल जाधव हे फलटण शहर विकासाच्या नावाखाली उजाड करणार का?
फलटण: फलटण नगरपरिषदेअंतर्गत संत ज्ञानेश्वर पालखी अंतर्गत मार्गाचे सिमेंट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे.यामध्ये गजानन चौकामध्ये असणारी जुनी झाडे रस्त्यामध्ये येत आहेत. ती झाडे तोडू नयेत असे नागरिक व पर्यावरण प्रेमी यांचे म्हणणे आहे. संत तुकारामांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाचाही प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. पाचगणी नगरपालिकेमध्ये कार्यरत असताना मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यपद्धतीद्वारे नगरपालिकेला देशपातळीवरील पुरस्कार मिळवून दिला होता. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते सर्वत्र परिचित होते.आज तेच मुख्याधिकारी निखिल जाधव हे फलटणचे मुख्याधिकारी आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना खूप चांगल्या काम करण्याच्या अपेक्षा आहेत. मुख्याधिकाऱ्यांकडे फलटणचे नागरिक हे आशेने पाहत असतात.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सविनय विनंती अशी की, गजानन चौक, फलटण येथे रस्त्यालगतची असलेली शिरीष (Rain Tree) प्रजातीची महाकाय वृक्ष पालखी मार्ग रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी तोडण्यात येणार असल्याचे समजते. सदर वृक्ष हे अंदाजे ५० वर्षांहून अधिक जुने असून फलटण शहराच्या मध्यभागी पर्यावरणाचा समतोल राखणारे एक महत्त्वाचे नैसर्गिक वारसा आहेत. या वृक्षांमुळे उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये नागरिक, प्रवासी तसेच मुक्या पशु-पक्षांना मोठ्या प्रमाणात सावली व आधार मिळतो. अनेक वर्षांपासून या वृक्षांवर House Crow, Jungle Crow यांसारख्या पक्षांची शेकडो घरटी प्रजनन काळात आढळून येतात. तसेच Spotted Owlet व Barn Owl यांसारखे महत्त्वाचे पक्षी देखील या वृक्षांचा निवारा म्हणून उपयोग करतात.
ही तीन वृक्ष केवळ झाडे नसून फलटण शहराच्या सौंदर्याची, पर्यावरणाची आणि जैवविविधतेची ओळख आहेत. शहरातील असंख्य नागरिक देखील या वृक्षांच्या संरक्षणासाठी आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत.
तरी आपणास नम्र विनंती की, रस्ता रुंदीकरणाचे नियोजन करताना सदर वृक्ष तोडले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच या वृक्षांच्या मुळांना किंवा फांद्यांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही यासाठी संबंधित विभागास योग्य त्या सूचना द्याव्यात.
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आपण सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे.
यावेळी नेचर अँड वाइल्ड लाइफ वेल्फेअर सोसायटीफलटण सचिव श्री.अभिजीत निकाळजे, प्रा.पायल चांडक,श्री.श्रीनिवास भुजबळ,प्रा.सुधीर इंगळे,प्रा.रविंद्र लिपारे यांची उपस्थिती होती.









