दिव्यांग बांधवांना, रेशनिंग धान्य मिळणे, घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देणे, संजय गांधी निराधार योजनेसाठी पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांची मिळावेत या मागण्याचे तहसीलदारांना निवेदन
अन्यथा 15 दिवसात ठिय्या आंदोलन करणार – सागर गावडे,प्रहार जनशक्ती पक्ष फलटण तालुकाध्यक्ष
फलटण: फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशनिंग धान्य नियमित मिळणे व संजय गांधी निराधार विभागामध्ये पूर्ण वेळ अधिकारी नियुक्त करावा यासह इतर मागण्यांचे निवेदन प्रहार संघटनेकडून फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,फलटण तालुक्यातील दिव्यांग बांधव तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना अनेक अडचणी येत आहेत.
यामध्ये तालुक्यातील दिव्यांग बांधवांना नियमितपणे रेशनिंग धान्य मिळत नाही.फलटण तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव तसेच दिव्यांग व विधवा लाभाथ्यांना रेशनिंग दुकानातून नियमितपणे धान्य मिळत नाही. काही लाभार्थ्यांना इष्टांक कमी असल्याचे कारण सांगून रेशनिंग धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळे गरजू दिव्यांग बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी आपल्या स्तरावरून तालुक्यातील रेशनिंग कार्डधारकांचा सर्वेक्षण करून गरजू दिव्यांग, विधवा व निराधार लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य मिळेल याची व्यवस्था करावी.
तसेच संजय गांधी निराधार अनुदान विभागामध्ये पूर्ण वेळ अधिकारी नियुक्त करण्यात यावा.फलटण तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागामध्ये लाभार्थ्यांच्या कामासाठी पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे या विभागामध्ये पूर्ण वेळ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून तसेच कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे नाव, पद व कामकाजाची वेळ दर्शविणारा फलक लावण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना माहिती मिळण्यास सोपे जाईल.
दिव्यांग बांधवांना घरकुलांसाठी तालुक्यातील जागा मागणी संदर्भातील प्रस्ताव बरेच दिवस झाले प्रलंबित आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे .देशाला स्वतंत्र होऊन ८० वर्ष झाले परंतु दिव्यांग बांधवाना मुलभूत गरजांसाठी न्याय मागवा लागत आहे. ही खेदाची बाब आहे.आपण वेळोवेळी मिटिंग घेतो परंतु यावर कोणताही तोडगा निघताना दिसत नाही तरी आपण वरील विषयांवर आपल्या स्तरावरून तातडीने योग्य ती कार्यवाही अन्यथा कोणतेही पर्व सूचना न देता १५ दिवसांत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आला आहे.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष महेश जगताप, संग्राम इंगळे, अभिषेक गुंजवटे यांच्या सह्या आहेत.









